आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या व्यक्तीच्या हयात जोडीदारांना मानधन मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती २ जानेवारी २०१८ पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात हयात जोडीदार पती/पत्नी केवळ अशा व्यक्तींनी अनुज्ञेय असलेले मानधन मिळण्याकरिता २५ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असे अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
१५ सप्टेंबर २०१८ च्या शासन पूरक पत्रासोबतच्या परिशिष्ट ब मधील शपथपत्र अर्जासोबत जोडावे. सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणी कालावधीत लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदिवास भोगावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्यासंबंधीच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत २७ जून २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ९० दिवसांपर्यत अर्ज दाखल करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.



