राजापुरात २० वर्षीय तरुणीचा तापाने मृत्यू; परिसरात हळहळ

राजापूर : शहरातील दिवटेवाडी येथील २० वर्षीय तरुणीचा तापाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रावणी मनोज पवार (वय २०, रा. दिवटेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या मृत्यूने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रावणी पवार हिला ३ दिवसांपासून ताप येत होता. तिला घरच्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी ती कॉलेजमध्ये गेली होती; मात्र सायंकाळी आल्यानंतर तिला पुन्हा ताप भरल्याने राजापूर ग्रामीण आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे काही वेळातच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान श्रावणी हिच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



