रत्नागिरी जिल्ह्यातील हरविलेले १८७ मोबाइल नागरिकांना परत

रत्नागिरी : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून हरविलेले १८७ जणांचे मोबाइल कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले.
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यामधील नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाइलची माहिती रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, अजिंक्य ढमढेरे यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अंमलदार यांनी एकत्रित काम करून गहाळ झालेल्या सर्व मोबाइलचा शोध घेतला. यामध्ये १८७ मोबाइलचा शोध घेऊन ते परत मिळवण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आले आहे.

२४ नोव्हेंबर कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते हे सर्व मोबाइल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. तसेच सायबर क्राईम सारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनकडे संपर्क साधण्याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोली अधीक्षक श्री. महामुनी यांच्यासह रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी निलेश माईनकर, लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.



