पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आरसीसीच्या माध्यमातून शेतकरीपुत्र सौरभ रावणांग याला सायकल भेट

रत्नागिरी : विविध सायकलिंग तसेच रनिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवणारा निवळी येथील सायकलपट्टू, धावपट्टू शेतकरीपुत्र सौरभ रावणांग याला राज्य कृषी मूल्य आयोग व कार्यकारी अध्यक्ष (मंत्री दर्जा) पाशा पटेल यांच्या हस्ते एका कार्यक्रमात रेसर सायकल देण्यात आली, सोबतच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकडे या सायकलची जबाबदारी देखील देण्यात आली.
या सायकलसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिला. रेसर सायकल नाही म्हणून कोकणातील सायकलपटू चांगल्या स्पर्धांना मुकायला नकोत या विचाराने हा निधी उपलब्ध करून दिल्याचे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी नमूद केले आणि ही सायकल घेऊन कोकणातील सायकलपटू लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसावेत असा आशावाद व्यक्त केला. येथे आयोजित बांबू परिषदेत ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सायकल प्रदान करण्यात आली.
गेले तीन चार वर्षे रत्नागिरी सायकलिस्ट क्लब जिल्ह्यामध्ये आणि पर्यायाने कोकणामध्ये सायकलिंग वाढवण्यासाठी कार्यरत आहे. क्लबच्या माध्यमातून सौरभसारखे सायकलपटू ही सायकल आता वापरू शकतील आणि या दर्जेदार सायकलमुळे त्यांच्या मेहनतीला नवा वेग येईल आणि कामगिरी नक्की उंचावेल, असे यावेळी क्लबच्या माध्यमातून सांगण्यात आले.
या निमित्ताने रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने असेच दर्जेदार खेळाडू शोधत राहावेत, त्यांच्याकडून रिझल्ट मिळावा यासाठी त्यांना ट्रेन करावे, चांगले रिझल्ट मिळाल्यास नक्की अशा रेसर सायकल जास्त प्रमाणात कोकणामध्ये आपण वितरित करू, असे देखील यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सभासद आणि३०० हून अधिक शेतकरी बांधव उपस्थित होते.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमुळे सायकलिंग तर कोकण कोस्टल मॅरेथॉनमुळे रनिंगमध्ये माझी लक्षणीय सुधारणा झाल्याचे यावेळी सौरभ रावणांग याने सांगितले.



