मालगुंड येथे ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचा लोगो अनावरण

रत्नागिरी : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण (ता. चिपळूण) या संस्थेमार्फत १३, १४ व १५ फेब्रुवारी या कालावधीत शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित केले आहे. या संमेलनाच्या लोगोचे अनावरण आज (८ फेब्रुवारी) तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे महाराष्ट्र साहित्य परिषद रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा व रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचे हस्ते करण्यात आले.
सौ. सुर्वे यांनी ग्रामीण, कृषी व सहकार या ग्रामीण भागाशी निगडित असलेल्या एकत्रित तीन विषयांवर साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भरविले जात असल्यामुळे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने साहित्य प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. यावेळी नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिल्पा सुर्वे यांचा साहित्य संमेलनाचे संयोजन समितीकडून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मालगुंडच्या सरपंच सौ. श्वेता थेऊर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर उपस्थित होत्या.
या प्रसंगी शिल्पा सुर्वे यांनी मांडकी पालवण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी सर्व साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने साहित्य प्रेमी उपस्थित होते.



