पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात मराठी भाषेचा वारसा आणि तिचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखिका व गीतकार अमृता नरसाळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर इयत्ता ५ वी ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व ‘मराठी गौरव गीत’ सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले.
प्रमुख अतिथी अमृता नरसाळे यांनी आपल्या मार्गदर्शनात मराठी भाषेची समृद्धी आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कवितांचे सादरीकरण केले. अंतरा रायकर व गीता गायकवाड यांनी अतिशय प्रभावीपणे काव्यवाचन केले. सहभागी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी मराठी भाषेचा अभिमान जपण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
या सोहळ्याला उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना शिरोळकर आणि मराठी विभाग प्रमुख संदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती शिरोळकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. प्रीती केळकर यांनी केले. सहा. शिक्षिका सौ. टापरे यांनी सर्वांचे आभार मानले. शाळेच्या कॅप्टन ठाकूर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



