डीबीजे महाविद्यालयात विद्यार्थी संसद परिषद उत्साहात

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयामार्फत ‘विकसित भारत युवा संसद’ कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. महाविद्यायातील तसेच महाविद्यालया व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील १८ ते २५ वयोगटातील युवक या कार्यक्रमात सहभागी झाले. ‘आणीबाणीची ५० वर्षे -भारतीय लोकशाहीसाठी बोध’ या विषयावर या युवकांनी आपले परखड व स्पष्ट मत मांडण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थित न. ए. सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, तर अध्यक्षस्थानी चिपळूण नगरपालिकेच्या उप-नगराध्यक्ष सौ. रूपाली दांडेकर, प्रमुख पाहुणे मुख्याध्याकारी संजय जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. राहुल मराठे, प्राचार्य डॉ. माधव बापट, प्रबंधक विजेंद्र जाधव, समन्वयक डॉ. ज्ञानोबा कदम तसेच या स्पर्धेसाठी तज्ञ परीक्षक, प्रा. युवराज पाटील, प्रा. डॉ. विराज महाजन, प्रा. डॉ. के. आर. चव्हाण, पत्रकार योगेश बांडागळे, सहभागी युवक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्वागत केले. तसेच शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे उद्दिष्ट सांगितले. या स्पर्धेतून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना पुढे जावून विधानसभा आणि लोकसभा या सर्वोच्च कायदेमंडळात जावून कायदे निर्मितीची जवळून पाहणी करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. या स्पर्धेतून उद्याचे भावी वक्ते, नेते, मंत्री तयार होतील असा आशावाद त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
रा. से. योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांनी या उत्सवात सहभागी व्हावे अशी भावना व्यक्त केली.
मुख्याध्याकारी संजय जाधव यांनी मनोगतात डीबीजे महाविद्यायाचे सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेसाठी नोडल महाविद्यालय म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. उप-नगराध्यक्ष सौ. रूपाली दांडेकर यांनी देखील शासनाने विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांना अशा संधीचा उपयोग करून सामाजिक विषयाचा अभ्यास करावा, तसेच ही स्पर्धा नसून आपलयाला व्यक्त होण्याची सुवर्ण संधी असल्याचे नमूद केले. या संधीचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांनी करावा, असे मत त्यांनी मांडले.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आभार समन्वयक डॉ. ज्ञानोबा कदम यांनी मानले. तसेच सूत्रसंचलन प्रा. श्वेता चितळे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाला जिल्हा स्तरातील अनेक महाविद्यालायातून जवळपास शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम आयुष सुर्वे, द्वितीय प्रणव गोडबोले, तृतीय सिमरन कांबळे, गुलजार आणि नयना सावंत या पाचही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी माहाविद्यालायातील सर्व प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी अथक परिश्रम घेतले आहेत.



