
रत्नागिरी : भारताच्या आगामी डिजिटल जनगणना २०२७ च्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रत्यक्ष कामकाजाला वेग आला आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्याची भौगोलिक व्याप्ती लक्षात घेऊन एकूण २७३१ घर यादी गट (एचएलओ ब्लॉक्स) निश्चित करण्यात आले. आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि माहिती संकलनासाठी प्रशासनाने ३१२३ कर्मचाऱ्यांची मोठी फळी तैनात केली आहे. यामध्ये २६२१ प्रगणक आणि ४६० पर्यवेक्षकांचा समावेश असून, त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी ४२ क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय सोयीसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी तहसीलदार हे ‘चार्ज ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत, तर शहरी भागातील नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी संबंधित मुख्याधिकारी यांची ‘चार्ज ऑफिसर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे माहिती नोंदवण्याचे सखोल प्रशिक्षण देण्यात येत आहे.
नागरिकांना या जनगणनेत स्वतःहून सहभागी होण्याची संधी देण्यात आली असून १ ते १५ मे या कालावधीत ‘सेल्फ इन्युमरेशन प्रक्रिया राबवली जाणार आहे. नागरिक secensus.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली व कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरू शकतात. पोर्टलवर विचारण्यात आलेल्या एकूण ३४ प्रश्नांची अचूक व प्रामाणिक उत्तरे भरून माहिती सबमिट केल्यानंतर नागरिकांना एक ‘एसई आयडी’ प्राप्त होईल. हा आयडी जपून ठेवणे आवश्यक असून, जेव्हा प्रगणक घरोघरी भेटी देतील तेव्हा त्यांना हा आयडी दाखवावा लागेल.
जिल्ह्यात घर यादी आणि गृहनिर्माण जनगणनेचा (एचएलओ) पहिला टप्पा १६ मे ते १४ जून या काळात पूर्ण केला जाणार आहे. जनगणनेचे हे काम राष्ट्राच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी अधिकृत पोर्टलचा वापर करुन माहिती भरावी किंवा घरी येणाऱ्या प्रगणकांना वस्तुनिष्ठ माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.



