मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २३ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २३ वा वर्धापन दिन नुकताच संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखान फाटा (ता. गुहागर) येथे संपन्न झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रार्थना म्हणून झाली. या कार्यक्रमासाठी युनायटेड हायस्कूल चिपळूणचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे, माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रत्नागिरीचे जे. पी. जाधव, गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संदीप अनंत आंब्रे, वरवेली गावाचे सरपंच नारायण आगरे, संस्थेचे सल्लागार अरुण मुळे, विनायक ओक, प्रकाश बापट, किरण शिंदे, जिल्हा परिषद रत्नागिरी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक हर्षल रसाळ, पालशेत हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मनोज जोगळेकर, सामाजिक कार्यकर्ते शामकांत आठवले, जीवन शिक्षण शाळा गुहागर शिक्षिका श्रीमती जोगळेकर, पत्रकार गणेश किर्वे, मंदार गोयथळे, पालपेणे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. हसबे, संतोष रांजाणे, दीपक विचारे, विनायक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी संस्थेच्या वाटचालीची तसेच संस्थेने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या व दिव्यांगांना असणाऱ्या अडचणी प्रामुख्याने मांडल्या. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा असा दिव्यांग मित्र पुरस्कार संदीप अनंत आंब्रे, चिपळूण यांना, तर दिव्यांग साथी पुरस्कार पत्रकार गणेश किर्वे (वरवेली ता. गुहागर) यांना, तर स्वयंसिद्ध पुरस्कार क्रिशा कल्पेश देवळे (रा. अडुर ता. गुहागर) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच निधी संकलन उपक्रमामध्ये श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरची विद्यार्थिनी सान्वी शैलेंद्र खातू व अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय गुहागरचा साकेत समीर गुरव या विद्यार्थ्यांना पारितोषक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्थेमार्फत “नासा” व “इस्रो”मध्ये निवड झालेल्या जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा गुहागर चे विद्यार्थी सोहम समीर बावधनकर, अभिनव मनोज शिंदे, कौशल सुहास धनावडे, निर्विघ्न नकुल वायंगणकर, सानवी संजय जांगळी आणि जिल्हा परिषद मुंढर या शाळेची विद्यार्थिनी स्वरा संतोष लांजेकर या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व शैक्षणिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ज्या शाळांनी निधी संकलन उपक्रमात उल्लेखनीय निधी जमा केलेल्या अशा माध्यमिक शाळांचा व केंद्रांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.

या वर्धापन दिनानिमित्ताने प्रथमच सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद कानडे यांनी मनोगतामध्ये प्रथम सर्व दिव्यांग बंधू-भगिनींना शुभेच्छा देतानाच दिव्यांग संस्था असून ती समाजातील इतर लोकांसाठी पुरस्कार देते ही बाब फार मोठी आहे, या संस्थेच्या कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार व गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश अनगुडे व रूपेश सौंदेकर यांनी केले. भरत कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी योगेंद्र विचारे (वरवेली) यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस सुनील रांजणे, अमित जोशी, प्रवीण मोहिते, सुनील मुकनाक, सानिका रांजणे, वेदिका आंबेकर, संतोष घुमे व संतोष कदम यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!