सीसीटीव्ही ठरावाला चार वर्षे; अद्यापही अंमलबजावणी नाही

रत्नागिरी : तालुक्यातील ग्रामपंचायत वाटद मिरवणे येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या मासिक सभेत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता; मात्र तब्बल चार वर्षे उलटूनही आजतागायत त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
आरटीआय कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे यांनी या ठरावासाठी ऑक्टोबर २०२४ पासून सातत्याने पाठपुरावा केला. जुलै २०२५ मध्ये उपोषण करण्याचा इशारा दिल्यावर प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले होते. पण आश्वासनाला महिने उलटूनही अधिकारी सुस्तच राहिले आहेत याबाबत सरपंच व ग्रामसेवकांना विचारले असता एकमेकाकडे बोट दाखवणे व पडलेली जबाबदारी हटकवणे हेच काम चालू आहे.
“ग्रामस्थांना फक्त गाजर दाखवायचं आणि काम काही करायचं नाही, हीच का प्रशासनाची शैली?” ठरावाच्या अंमलबजावणी करायचीच नसेल तर कशाला ग्रामसभा व मासिक सभा घ्याव्यात, असा सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे. ठराव, आश्वासन, उपोषणाची. एवढं सगळं होऊनही एक साधा सीसीटीव्ही कॅमेरा दोघांच्या दालनामध्ये बसवता आला नाही, यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ठरावाची अंमलबजावणी बंधनकारक आहे. तरीदेखील चार वर्षे कारवाई न होणे म्हणजे नागरिकांचा विश्वासघात असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. संबंधित तात्काळ कॅमेरे न लावल्यास ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व या प्रकरणात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी स्तरावरून चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांमार्फत केली जाणार आहे.



