सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कृती कार्यक्रम

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत झाडगाव (रत्नागिरी) येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कृती कार्यक्रम आखण्यात आलेत.
प्रारंभी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात झाडगाव परिसरात प्लास्टिक प्रदूषण मुक्ती अभियान अंतर्गत प्लास्टिक युक्त कचरा गोळा करण्यात आला. तसेच यावेळी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. यानंतर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतनकुमार चौधरी यांनी ‘पर्यावरण शपथ’ दिली.
प्लास्टिक कचरा मुक्तीचा संकल्प आणि स्वच्छता मोहीम पर्यावरण दिनाची सुरुवात केंद्राच्या परिसर आणि लगतच्या भागात राबवण्यात आलेल्या प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेने झाली. संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन परिसरातील प्लास्टिक आणि इतर विघटन न होणारा कचरा गोळा केला. प्लास्टिकच्या वाढत्या धोक्याविषयी जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
वृक्षारोपण आणि निसर्गाचे जतन स्वच्छता मोहिमेनंतर केंद्र परिसरात ‘वृक्षारोपण’ करण्यात आले. डॉ. केतनकुमार चौधरी यांच्या हस्ते आणि उपस्थित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक प्रजातींच्या विविध झाडांची रोपे लावण्यात आली. केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही यावेळी उपस्थित सर्वांनी घेतली.
पर्यावरण शपथ ग्रहण कार्यक्रमाच्या सांगता समारंभात डॉ. केतनकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपस्थितांनी ‘पर्यावरण शपथ’ घेतली. निसर्गाचे रक्षण करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि दैनंदिन जीवनात शाश्वत पद्धतींचा अवलंब करणे, अशी प्रतिज्ञा सर्वांनी केली.
यावेळी भाषणात बोलताना डॉ. चौधरी यांनी समुद्रातील वाढते प्लास्टिक प्रदूषण आणि बदलते हवामान यावर चिंता व्यक्त केली. सागरी जीवसृष्टी वाचवण्यासाठी आणि मानवाच्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेश ठोकळ, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतनकुमार चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाद्वारे (यु.एन.ई.पी.) २०२६ या वर्षासाठी “निसर्गापासून प्रेरित. हवामानासाठी. आपल्या भविष्यासाठी.” अशी अधिकृत संकल्पना जाहीर करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व विभाग प्रमुख डॉ. केतनकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. आसिफ पागारकर, सहाय्यक संशोधन अधिकारी डॉ. मनोज घुघुसकर, अभिरक्षक डॉ. हरिष धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, तसेच वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती ए. एन. सावंत यांनी विशेष सहभाग नोंदविला. तसेच या कार्यक्रमात जलजीविका रत्नागिरी या संस्थेचे अधिकारी चिन्मय दामले हजर होते. या कार्यक्रमासाठी मत्स्यालय यांत्रिक मनीष शिंदे, शिपाई सुहास कांबळे, मजूर सचिन चव्हाण, क्षेत्र संग्राहक प्रवीण गायकवाड, तेजस जोशी, योगेश पिलणकर, स्वप्नील आलीम, श्री. पेडणेकर व प्रशांत पिलणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.



