अवैध खोदकामामुळे ८० फूट संरक्षक भिंत कोसळली, रस्ता खचल्याने ७ ते ८ घरांना मोठा धोका

रत्नागिरी : शहरातील फगरवठार भागातील खासगी जागेत सुरू असलेल्या चुकीच्या आणि अवैध खोदकामामुळे तब्बल ८० फूट लांब संरक्षक भिंत कोसळली असून, लागून असलेला मुख्य रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरातील ७ ते ८ घरांना थेट धोका निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील भगरवठार परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका जागेवर मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू होते. मात्र, हे खोदकाम करताना कोणत्याही सुरक्षेच्या नियमांचे पालन केले गेले नाही. अत्यंत चुकीच्या आणि अवैध पद्धतीने डोंगर किंवा जागा पोखरली गेल्याने जमिनीचा पाया कमकुवत झाला. या बेजबाबदार खोदाईमुळे अचानक येथील ८० फुटांची अजस्त्र संरक्षक भिंत पत्त्यासारखी कोसळली. भिंत कोसळल्याने येथील मुख्य रस्त्याचा मोठा भागही खचला आणि थेट खाली आला.
रस्ता खचल्यामुळे आणि भिंत कोसळल्यामुळे या रस्त्याच्या कडेला असलेल्या ७ ते ८ घरांना तीव्र धोका निर्माण झाला आहे. या घरांचा पाया आता उघडा पडण्याची शक्यता असून, कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते. संभाव्य धोका ओळखून स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून, तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.



