जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी
नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे खेड पालिका प्रशासनाचे आवाहन

खेड : रत्नागिरी जिल्ह्यात गेले चार दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून, नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खेड शहरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर खेड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील नागरिक व व्यापारी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गेले चार दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे, औषधे, अन्नधान्य व इतर अत्यावश्यक वस्तूंची तयारी ठेवावी. तसेच नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास तयार राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन खेड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.



