आंबा घाट पुन्हा वाहतुकीसाठी बंद
दरड कोसळल्याने सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी : एसटीच्या फेऱ्या अणुस्कुरा मार्गे वळवल्या

रत्नागिरी : रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबाघाट मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड कोसळल्यामुळे मार्गावर वाहतुकीला धोका निर्माण झाल्याने रत्नागिरीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पुढील आदेश येईपर्यंत आंबाघाट मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आंबा घाट मार्ग बंद झाल्यामुळे रत्नागिरीहून कोल्हापूर तसेच कोल्हापूरहून रत्नागिरीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. या वाहतूकबंदीचा एसटी बससेवेवरही परिणाम झाला असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आंबाघाट मार्गे धावणाऱ्या एसटीच्या सर्व फेऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
अणुस्कुरा मार्गे एसटीची वाहतूक
आता रत्नागिरी–कोल्हापूर मार्गावरील एसटी बस लांजा–वाटूळ–ओणी–पाचल–अणुस्कुरा–मलकापूर मार्गे कोल्हापूर अशी धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आंबाघाट मार्ग बंद असल्याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरड कोसळलेल्या ठिकाणी मार्गाची सद्यस्थिती तसेच सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतरच आंबाघाट मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी बंद असलेल्या आंबाघाट मार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


