एकत्रित आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांचे आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व कुटुंबांचा योजनेत समावेश केला आहे. त्यानुसार १ जुलै २०२४ पासून विस्तारित कार्यक्षेत्रासह आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या विविध व्दितीय व तृतीय स्तरावरील आजारांवर रोखरहित व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी आपले आयुष्मान कार्ड तातडीने काढून घ्यावे व गरजेनुसार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण
एकत्रित योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला दरवर्षी रु. ५ लाखांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळते. कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य या लाभाचा वापर करू शकतात. तसेच वय वंदना योजनेअंतर्गत ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पात्र व्यक्तींना अतिरिक्त रु. ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध आहे. योजनेतील आजारांवरील उपचार पहिल्या दिवसापासून समाविष्ट असून, रुग्णालयात दाखल होण्यापासून रुग्ण घरी जाईपर्यंतचा उपचाराचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट असतो.
यामध्ये जळीत रुग्ण, हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, पेसमेकर, जन्मजात हृदयरोगावरील शस्त्रक्रिया, कर्करोगावरील केमोथेरपी, रेडिएशन व शस्त्रक्रिया, डायलिसीस, मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया, हाडांच्या शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, किडनी व लिव्हर विकार, मुतखडा, हर्निया, हायड्रोसिल, गर्भाशय शस्त्रक्रिया, जोखमीची प्रसूती, नवजात शिशू उपचार, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, सर्पदंश, विंचूदंश, विषबाधा, मानसिक आजार आदी २३९९ आजारांवरील उपचारांचा योजनेत समावेश आहे. तसेच किडनी प्रत्यारोपण, लिव्हर ट्रान्सप्लांट व बोन मॅरो ट्रान्सप्लांट यांसारख्या उपचारांचाही योजनेअंतर्गत लाभ घेता येतो.
योजनेच्या पॅकेजमध्ये खाट, परिचारिका, डॉक्टर व तज्ज्ञांचे शुल्क, तपासण्या, औषधे, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर व अतिदक्षता विभागाचे शुल्क, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, रक्त संक्रमण, निदान चाचण्या, रुग्णालयातील भोजन, डिस्पोजेबल व कन्झ्युमेबल साहित्य तसेच नियमानुसार रुग्णवाहतूक खर्चाचा समावेश आहे. उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंतीवरील आवश्यक उपचारांचाही समावेश पॅकेजमध्ये केला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १,०४,४१० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील १६,५७,६६५ पात्र लाभार्थ्यांपैकी ८,६३,७३० लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले आहेत. तसेच ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६४,१६७ पात्र लाभार्थ्यांपैकी १७,११२ लाभार्थ्यांना वय वंदना कार्ड देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा समन्वयक डॉ. रंजित सरनाईक यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच संबंधित शासकीय आरोग्य संस्था योजनेअंतर्गत अंगीकृत आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय अंगीकृत खासगी रुग्णालयांमध्येही लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत रोखरहित उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
रत्नागिरी तालुका : परकार हॉस्पिटल, रामनाथ हॉस्पिटल, चिंतामणी हॉस्पिटल, श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हॉस्पिटल, नन्दादीप आय हॉस्पिटल, इन्फीगो आय हॉस्पिटल.
चिपळूण तालुका : बीकेएल वालावलकर हॉस्पिटल, श्री. हॉस्पिटल, एसएमएस हॉस्पिटल, अपरान्त हॉस्पिटल, लाइफकेअर हॉस्पिटल, बाई रतन बाई घरडा हॉस्पिटल, परशुराम हॉस्पिटल.
खेड तालुका : एसएमएस हॉस्पिटल, रॉयल हॉस्पिटल.
लांजा तालुका : श्री. स्वामी समर्थ हॉस्पिटल.
गुहागर तालुका : श्री. सिद्धिविनायक हॉस्पिटल, रामपूर.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत संगणक परिचालक तसेच आशा सेविका यांच्या माध्यमातून काढता येते. तसेच आयुष्मान मोबाईल ॲपद्वारे लाभार्थी स्वतःही आयुष्मान कार्ड काढू शकतात.
योजनेची माहिती, उपचारांची उपलब्धता किंवा तक्रारींसाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र लाभार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहाय्य करतात. त्यामुळे
योजनेची माहिती व तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक : 1800233220 / 155388
संकेतस्थळ : www.jeevandayee.gov.in



