२९ सप्टेंबर रोजी ‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन
युवक-युवतींनी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

रत्नागिरी : राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी उपलब्ध करून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

या रोजगार महाकुंभासाठी उद्योग, नामांकित कंपन्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), मोठी आस्थापने तसेच सेवा क्षेत्रातील रोजगारदात्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. रिक्त पदांची संख्या, पदनिहाय पात्रता आणि आवश्यक कौशल्यांची निश्चिती करून जास्तीत जास्त कंपन्यांना या मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे.
विशेष घटकांच्या सहभागावर भर
आयटीआय, कौशल्य प्रशिक्षण केंद्रे, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच जिल्हा रोजगार कार्यालयांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात आहे. यामध्ये महिला, दिव्यांग, ग्रामीण युवक आणि अल्प उत्पन्न गटातील उमेदवारांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
मेळाव्यापूर्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी सक्षम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, रेझ्युमे लेखन, मुलाखत कौशल्य, उद्योगांच्या गरजेनुसार अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण व ओरिएंटेशन यांचे मार्गदर्शन केले जाईल.
मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणी, समुपदेशन, कागदपत्र पडताळणी, प्रत्यक्ष मुलाखती, निवड प्रक्रिया आणि ऑफर लेटर वितरणासाठी स्वतंत्र कक्ष उभारले जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर दिल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष जॉइनिंगबाबत नियमित पाठपुरावा ठेवण्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

