मुख्य बातमी

आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्थेच्या ‘रिमझिम रिमझिम’ काव्यमैफिलीत रत्नागिरी रंगली

रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्था, कोकण विभाग, रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरीतील कवी-कवयित्रींसाठी आयोजित केलेला ‘रिमझिम रिमझिम’ हा काव्यमय कार्यक्रम रत्नागिरी येथे उत्साहात पार पडला. रत्नागिरीतील कवी-कवयित्रींना आपली काव्यप्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या कार्यक्रमाला कवींसह श्रोतेवर्गाचीही उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

रत्नागिरीतील अ. के. देसाई हायस्कूलच्या रंगमंचावर रंगलेल्या या कार्यक्रमात एकूण २० कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला. पावसाळा, निसर्ग, श्रावण आणि विविध भावविश्व उलगडणाऱ्या कवितांच्या सादरीकरणाने कार्यक्रम बहारदार झाला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आ सि ले कोकण प्रमुख सुनेत्रा जोशी व कार्यकारिणी सदस्य ऋतुजा कुलकर्णी यांच्यासह समूहातील ज्येष्ठ सदस्या कुंदा बापट यांनाही दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उमा जोशी यांनी केले. त्यांनी रिमझिम रिमझिम कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी व संस्थेच्या कामाजाविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेची माहिती दिली. तसेच राज्य कार्यकारिणीत प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी घेतलेल्या ऋतुजा कुळकर्णी यांचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी नव कवींना झटपट प्रसिद्धीच्या मागे न लागता सातत्याने सराव करून लिहिण्याची तसेच सादरीकरण करण्याची कला आत्मसात करावी, असे सांगितले. कार्याध्यक्ष ऋतुजा कुलकर्णी, तंत्रज्ञान सहाय्यक उमा जोशी यांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.

या काव्यमैफलीत वैजयंती पाटील, शमा प्रभुदेसाई, दीप्ती झगडे, प्रियांका रांजे, शर्विल रांबाडे, अनुष्का नागवेकर, श्रावणी शिंदे, कुंदा बापट, चित्रा गोस्वामी, वसुंधरा जाधव, रोहित नाटेकर, मानसी चव्हाण, प्रभात कोकझे, स्नेहल शेवडे, गौरी थत्ते, उमा जोशी, विस्मया कुलकर्णी, तन्वी पटवर्धन, अनुराधा आपटे, सुनेत्रा जोशी आणि ऋतुजा कुळकर्णी यांनी सहभाग घेतला.

या कार्यकेमाचे सूत्रसंचालन अनुराधा आपटे यांनी केले. विविध आशयांनी नटलेल्या कवितांच्या सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रत्येक कवी-कवयित्रीने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान निर्माण झालेले उत्साही आणि आनंददायी वातावरण या काव्यमैफलीचे विशेष आकर्षण ठरले.

आम्ही सिद्ध लेखिका ही महिलांसाठी असलेली साहित्य संस्था असून त्यांनी स्त्री पुरुष असा एकत्रित कार्यक्रम पहिल्यांदा आयोजित केला . या कार्यक्रमामुळे रत्नागिरीतील साहित्यप्रेमी, कवी-कवयित्री आणि रसिक यांना एकत्र येऊन कवितेचा आनंद घेण्याची सुंदर संधी मिळाली.

आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभागाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा साहित्यिक उपक्रमांमुळे स्थानिक कवी-कवयित्रींना हक्काचे व्यासपीठ मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात ज्यांची कविता उत्तम व सादरीकरण छान होते त्यांना पुस्तक देऊन गौरविण्यात आले. व उपस्थित सर्वांना पेन देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमात सादर झालेल्या कवितांचे इ बुक तयार करण्यात येणार असल्याचा सुखद धक्का देण्यात आला.

आभार प्रदर्शन करताना ऋतुजा कुळकर्णी यांनी सांगितले की, आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे सगळ्यात पहिला सहभाग या अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व संस्थेच्या सदस्या अंजली पिलणकर यांनी घेतला. संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित कवी कवयित्री कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेला श्रोता वर्ग, सूत्रसंचालिका अनुराधा आपटे, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पूर्ण वेळ उपस्थित असलेले अ. के. देसाई हायस्कूलचे कर्मचारी परब यांचेही आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!