रत्नागिरीत ८ सप्टेंबरला विभागीय ‘डाक अदालत’चे आयोजन; ४ सप्टेंबरपर्यंत तक्रारी पाठवण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी डाक विभागामार्फत विभागीय स्तरावरील ‘डाक अदालत’चे आयोजन ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. ही अदालत रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर कॉलेज शेजारील डाकघर अधीक्षक कार्यालयात पार पडणार आहे. डाक विभागाशी संबंधित ज्या तक्रारींचे अद्याप निवारण झालेले नाही किंवा ज्यांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची दखल या डाक अदालतीमध्ये घेतली जाणार आहे.
टपाल व स्पीड पोस्ट सेवा, काउंटर सेवा व पार्सल, डाक वस्तू, पोस्ट ऑफिस बचत बँक व मनीऑर्डर या सेवांबाबतच्या तक्रारींची दखल यात घेतली जाणार आहे.
तक्रार अर्ज पाठवण्यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारीचा अर्ज सर्व आवश्यक तपशिलांसह ‘अधीक्षक, डाकघर कार्यालय, रत्नागिरी विभाग’ यांच्या नावे पाठवावा. तक्रार अर्ज ४ सप्टेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. एका व्यक्तीने एकाच तक्रारीचा अर्ज सादर करावा. ४ सप्टेंबरनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे डाक विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
डाक सेवेबाबत अडचणी असलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन वेळेत तक्रार अर्ज सादर करावेत, असे आवाहन रत्नागिरी विभागाच्या डाकघर अधीक्षकांनी केले आहे.



