रत्नागिरीतील शासकीय रक्तपेढीत रक्तपुरवठ्याची गरज
डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्ताची मागणी वाढली : रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन

रत्नागिरी : सध्या रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी रुग्णांसाठी रक्ताची मागणीही वाढली असून, त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर आवश्यक रक्त उपलब्ध करून देताना रक्तपेढीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील रक्तपेढीमार्फत रक्तदात्यांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे तातडीचे आवाहन करण्यात आले आहे.
निरोगी व रक्तदान करण्यास पात्र असलेल्या नागरिकांनी शक्य तितक्या लवकर रक्तदान करावे, अशी लवाहन रक्तपेढीमार्फत करण्यात आले आहे. आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
डेंग्यू तसेच इतर आजारांवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी समाजातील अधिकाधिक रक्तदात्यांनी या जीवनदायी सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



