भातलावणीच्या हंगामात कुंभारखाणी खुर्द परिसरात गव्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

संगमेश्वर : तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द येथील भोजनेवाडी, गडगेवाडी आणि खडकेवाडी परिसरात सध्या गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भातलावणीची कामे सुरू असतानाच गव्यांचे कळप शेतात घुसून नव्याने लावलेल्या भात पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या भागातील अनेक शेतकऱ्यांनी भातलावणीची कामे पूर्ण केली आहेत. मात्र रात्रीच्या वेळी गवे शेतात शिरून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती करणे कठीण होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत वन विभाग व संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गव्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.



