कृषी विभागामार्फत १४ ऑगस्ट रोजी ‘रानभाजी’ आणि ‘पौष्टिक तृणधान्य’ पाककला स्पर्धा

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६ साठी ‘रानभाजी पाककला स्पर्धा’ आणि ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. महिलांना व पाककला प्रेमींना आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. ही स्पर्धा १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत येथील विवेक हॉटेल – देसाई बँक्वेट हॉल येथे पार पडेल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नसून, एका स्पर्धकाला एका वेळी एकाच (रानभाजी किंवा पौष्टिक तृणधान्य) स्पर्धेत भाग घेता येईल. रानभाजी पाककृतीमध्ये मुख्य घटक ‘रानभाजी’ असणे अनिवार्य आहे. पौष्टिक तृणधान्य पाककृतीमध्ये मुख्य घटक बाजरी, नाचणी, वरी, राळा, हरिक यांसारखे ‘तृणधान्य’ असणे आवश्यक आहे. पदार्थ आणि सजावट: स्पर्धकांनी पदार्थ घरूनच बनवून आणावा. सजावटीचे साहित्य स्वतः आणावे व सजावट पूर्णपणे खाण्यायोग्य घटकांचीच असावी. पाककृतीची माहिती: बनवलेल्या पदार्थाची संपूर्ण कृती आणि त्याचे पौष्टिक गुणधर्म A4 साईज कागदावर लिहून पदार्थासोबत ठेवणे बंधनकारक आहे. स्पर्धकांनी आपल्या पदार्थांची मांडणी सकाळी ९ ते १० या वेळेतच करणे आवश्यक आहे. सकाळी १० नंतर येणाऱ्या स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार नाही.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर, पौष्टिक तृणधान्य स्पर्धेसाठी पहिल्या ३० तर रानभाजी स्पर्धेसाठी पहिल्या ४० स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना आयोजकांमार्फत आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
नावनोंदणीसाठी हर्षला पाटील (9422441571), नेहा पवार (9423203641), गौरी शेरे (9403144581) यांच्याशी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय किंवा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय, रत्नागिरी येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



