अंगणवाडी मदतनीस पदासाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी १ मार्फत ग्रामपंचायत चांदेराई ग्रामपंचायती मधील इब्राहीमपटटण, नाणीज मधील सरफरेवाडी या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरावयाचे असून, इच्छूक स्त्री स्थानिक उमेदवारांनी २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी १, साईप्रसाद बिल्डींग एकता मार्ग, मारुती मंदीर, ता.जि.रत्नागिरी येथे अर्ज करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी १ यांनी केले आहे.
शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण आवश्यक (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. (गुणपत्रक आवश्यक) पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड, बी.एड असल्यास गुणपत्रक आवश्यक आहे.
वास्तव्याची अट : ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे मधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
वयाची अट : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी (By Nomination) वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहिल. तथापि, विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहिल. विधवा/अनाथ असलेबाबत दाखला (असल्यास दाखला), लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती तसेच इतर मागास प्रवर्ग/विमुक्त जाती/भटक्या जमाती/आर्थिकदृष्टया दुर्बल घटक/ विशेष मागास प्रवर्ग/ सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला जोडला असल्यास गुणांकन देण्यात येईल. अंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक (MSCIT) अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरविलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास आवश्यक. गुणांकन ३० जानेवारी २०२५ च्या शासननिर्णयानुसार राहील.
आवश्यक माहितीसाठी सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत संपर्क साधावा. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही.



