रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबविणार विशेष रस्ता सुरक्षा उपक्रम “ऑपरेशन T.A.P.E for SAFE”

रत्नागिरी : जिल्ह्यातील वाढत्या रस्ता अपघातांना आळा घालून अपघातांमध्ये किमान १० टक्के घट आणण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात “Operation T.A.P.E for SAFE” हा विशेष रस्ता सुरक्षा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी), जनजागृती (अवेअरनेस), कायदेशीर कारवाई (पेनल्टी) आणि अभियांत्रिकी सुधारणा (इंजीनियरिंग) (T.A.Ρ.Ε.) या चार प्रभावी स्तंभांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेला नवे बळ देण्यात येणार आहे.
तंत्रज्ञान : यामध्ये वेगमर्यादा व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर केसेस केल्या जातील. हे करताना स्पीडगनचा वापर व इतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सीसीटीव्ही, स्पीड डिटेक्शन उपकरणे, बॉडी वॉर्न कॅमेरे व इतर डिजीटल प्रणालींचा वापर केला जाईल. अपघात प्रवण ठिकाणांचे जीआयएस आधारीत मॅपिंग करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यामध्ये, iRAD, Digital Mapping ई. चा प्रभावीपणे वापर करण्यात येणार. सर्व अपघातांच्या माहितीचे गुगल बेस्ड योग्य विश्लेषण करून त्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सेफ ड्राईव्ह ॲप तयार करण्यात येणार आहे.
जनजागृती : यामध्ये पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, महाविद्यालये, औद्योगिक संस्था, ग्रामपंचायत व सार्वजनिक ठिकाणी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट घालणे, चारचाकी वाहन चालविताना सिट-बेल्ट लावणे तसेच वाहनांची वेगमर्यादा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये इत्यादी बाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सोशल मीडिया, स्थानिक प्रसारमाध्यमे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्यापक प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. युवक, स्वयंसेवक व नागरीकांचा रस्ता सुरक्षा उपक्रमात सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार.
कायदेशीर कारवाई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व वाहन चालकांविरुध्द विशेष मोहिम टराबवून मोटार वाहन कायद्यान्वये सर्व हेडखाली कठोर व नियमीत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सतत गुन्हा करणारे वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याबाबत आर.टी.ओ यांना जास्तीत जास्त प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी सुधारणा : अपघात प्रवण ठिकाणांची संयुक्त पाहणी करून समन्वयाने आवश्यक त्या सुधारणा संबधित विभागाकडून करून घेण्यात येणार व नियमीत इतर विभागांशी समन्वय ठेवण्यात येणार आहे. इशारा फलक, रोड मार्किंग, रिफ्लेक्टर, स्पीड कालमिंग या सारख्या उपाययोजना व सुरक्षा बॅरिअर्स उभारण्यासाठी संबधित विभागांशी समन्वय ठेवण्यात येणार.
तसेच, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय पर्यवेक्षणाची जबाबदारी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांच्यामार्फत उपक्रमाच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे.
रत्नागिरी पोलीस दलामार्फत, “सुरक्षित रस्ता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.” या भावनेतून सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच रस्ता सुरक्षेबाबतच्या नाविन्यपूर्ण सूचना व कल्पना परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात (जिल्हा रस्ता सुरक्षा पर्यवेक्षण अधिकारी) यांच्याकडे थेट सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


