रत्नागिरीत विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशातील महिलेला कारावासाची शिक्षा

रत्नागिरी : बांगलादेशामधून विनापरवाना भारतात प्रवेश करून रत्नागिरीतील साळवीस्टॉप येथे वास्तव्य करणाऱ्या सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहील भोंबल (वय ३०) या महिलेला न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यभरात बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू असताना रत्नागिरी शहरातील साळवीस्टॉप येथे एक महिला बांगलादेशातून भारतात घुसून विनापरवाना रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहील भोंबल हिला अटक केली होती. भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३३६(३) पारपत्र भारतात प्रवेश नियम १९५० चा नियम ३(ए), ६(ए), विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४(अ) व कलम ७ प्रमाणे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या खटल्यावर सुनावणी होऊन येथील न्यायालयाने सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहील भोंबल हिला सहा महिने साधा कारावास, ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक दिवस साधा कारावास ही शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश शिवलकर यांनी केला होता.



