रत्नागिरी जिल्हा पोलिसांची सामाजिक बांधिलकी
"मुख्यमंत्री सहायता निधी"साठी दिले १० लाखांहून अधिक रकमेचे योगदान

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा व विदर्भ येथे नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत सामाजिक जबाबदारी आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्याप्रती असलेल्या बांधिलकीच्या नात्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मराठवाडा व विदर्भ येथील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून “मुख्यमंत्री सहायता निधी” साठी १० लाख ६२ हजार ९५ रुपये इतकी रक्कम सुपूर्द केली आहे.
१२ ऑक्टोबर रोजी या रकमेचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे व जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते थेट सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे गृह राज्य मंत्री योगेश कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
ही रक्कम जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःच्या एक दिवसाच्या वेतनातून स्वेच्छेने दिलेल्या योगदानातून जमा करण्यात आली आहे.



