दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी

रत्नागिरी : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग कल्याण विकास पुनर्वसन व सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटना/संस्थांनी दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे यांच्याकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्या संस्थांची नोंदणी झाली नसेल अशा पात्र संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
नोंदणी नसल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ५० चे उल्लंघन करणारी असून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९१ नुसार कारवाई साठी पात्र ठरेल. जिल्हयातील सर्व संस्था/ संघटनांच्या कामकाजात समानता आणणे व सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करताना नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी शुल्क प्रदान केलेल्या पावतीची प्रत, वार्षिक अहवाल, मागील तीन वर्षातील सनदी लेखा परिक्षण वास्तूची माहिती सोबत सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.



