जिल्ह्यात दुपारपर्यंत ४७.३८ टक्के मतदान

रत्नागिरी : जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद गट आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी आज (७ फेब्रुवारी) होत असलेल्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दुपारी ३:३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ४७.३८ टक्के मतदान झाले आहे. दुपारच्या सत्रात चिपळूण आणि गुहागर तालुक्यांनी मतदानात आघाडी घेतली असून, तिथे ५० टक्क्यांहून अधिक मतदान पार पडले आहे.
जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक ५०.४७ टक्के मतदान झाले आहे, तर त्यापाठोपाठ गुहागरमध्ये ५०.२४ टक्के नोंदणी झाली आहे. तुलनेने मंडणगड (४३.०९%) आणि राजापूर (४३.८१%) तालुक्यात मतदानाचा वेग काहीसा संथ असल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या उन्हाचा कडाका कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, अद्याप कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली दुपारी साडेतीनपर्यंतची मतदानाची तालुकानिहाय टक्केवारी अशी :
मंडणगड : ४३.०९ टक्के
दापोली : ४६.९८ टक्के
खेड : ४८.२८ टक्के
चिपळूण : ५०.४७ टक्के
गुहागर : ५०.२४ टक्के
रत्नागिरी : ४८.४९ टक्के
संगमेश्वर : ४५.३५ टक्के
लांजा : ४५.३१ टक्के
राजापूर : ४३.८१ टक्के



