रत्नागिरी रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह वापरण्यासाठी ५ रुपये वसुली, ठाकरे युवासेना आक्रमक
ठेकेदारावर कारवाई करण्याची जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृह वापरण्यासाठी बेकायदेशीरपणे ५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार युवासेनेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी आज कोंकण रेल्वे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील ‘ पे अँड यूज’च्या बोर्डावर लघवीसाठी प्रति व्यक्ती ५ रुपये शुल्क लिहिले आहे. कंत्राटदाराकडून हे शुल्क प्रवाशांकडून सक्तीने वसूल केले जात आहे. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे स्थानकांवर लघवीची सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असणे बंधनकारक आहे. मात्र, येथील कंत्राटदार नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.
“दररोज हजारो प्रवासी, विशेषतः कोकणात येणारे चाकरमानी, महिला, वृद्ध आणि गरीब प्रवाशांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या नाकाखाली ही बेकायदेशीर वसुली सुरू असणे अत्यंत संतापजनक आहे,” असे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात लघवीसाठी आकारले जाणारे 5 रुपये शुल्क त्वरित बंद करून ही सुविधा मोफत करावी, नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना लुटणाऱ्या कंत्राटदारावर कडक दंडात्मक कारवाई करावी, ‘लघवीसाठी कोणतीही फी नाही, ही सुविधा मोफत आहे’ असे फलक स्थानकावर ठळकपणे लावावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने प्रवाशांच्या हक्कासाठी स्थानकावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद आहे.
जर यावर उचित कार्यवाही झाली नाही तर ठेकेदाराचा माणूस आतमध्ये दिसणार नाही, असे प्रसाद सावंत यांनी या भेटी दरम्यान स्पष्ट सांगितले. तसेच रेल्वे स्थानक रोड वरील दुभाजक मधील झाडे वाहन चालकांसाठी धोकादायक असल्याने ती झाडे आकारामध्ये तोडावी अशी विनंती ही यावेळी करण्यात आली. यावेळी रितेश लोखंडे, निलेश पवार, साई गावडे, निखिल बने, ओमकार कारेकर उपस्थित होते.



