देऊडच्या १९ वर्षीय तरुणाचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील देऊड येथे घरासमोरील गाडीच्या शेडमधील चालू लाईनवर असलेला हॅलोजन बल्ब बदलताना, विजेचा प्रवाह सुरू असताना विजेचा तीव्र धक्का लागून १९ वर्षांच्या तरुणाचा जागीच अंत झाला. जयराज संजय देसाई असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (९ जून) दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. या घटनेने देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
जयराज सध्या आपले महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. अतिशय हुशार, अभ्यासू आणि तितकाच मितभाषी स्वभाव असलेल्या जयराजने आपल्या स्वभावाने महाविद्यालयात आणि गावात प्रत्येकाला आपलेसे केले होते. त्याच्या याच प्रेमळ स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवारही खूप मोठा होता.
मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे घराशेजारी असलेल्या गाडीच्या शेडजवळ जयराज काही काम करत होता. शेडमधील चालू लाईनवर असलेला हॅलोजन बल्ब बदलण्यासाठी अजाणतेपणाने त्याने हात पुढे केला. विद्युत प्रवाह सुरूच असल्याने चालू विजेचा अतिशय तीव्र धक्का लागल्याने तो क्षणात जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



