मुख्य बातमी

मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत क्षयरोग मुक्तीसाठी विशेष एक्स-रे मोहीम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : क्षयरोग (टीबी) मुक्त भारत अभियानांतर्गत तालुक्यातील मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावागावांत विशेष क्षयरोग शोध व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी या मोहिमेला भरघोस प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेचे उदघाटन जि. प. सदस्य राजेश साळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या माध्यमातून आयोजित या विशेष एक्स-रे मोहिमेत अवघ्या चार दिवसांत एक हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी व छातीचे एक्स-रे करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत असलेल्या २० महसुली गावांपैकी ११ गावांमध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

क्षयरोगाची लक्षणे असलेल्या तसेच जोखीम गटातील नागरिकांची तपासणी करून संभाव्य रुग्णांचा शोध घेण्यावर भर देण्यात आला. गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून तपासणी करून घेतल्याने मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावरून श्री. पावसकर व श्री. बंदेवाड यांनी विशेष सहकार्य केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

“क्षयरोगाचे वेळेवर निदान आणि उपचार हेच टीबी मुक्त समाजाचे प्रमुख साधन आहे. नागरिकांनी पुढेही अशा आरोग्य उपक्रमांना सहकार्य करावे,” असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

या मोहिमेमुळे क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून उर्वरित गावांमध्येही लवकरच तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!