तळवली येथे यंत्राद्वारे आधुनिक पद्धतीच्या भात लावणीचा शेतकऱ्यांनी घेतला अनुभव

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील तळवली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी विभागातर्फे भात लावणी महोत्सव पार पडला. यावेळी यंत्राद्वारे आधुनिक पद्धतीच्या भात लावणीचा अनुभव येथील शेतकऱ्यांनी घेतला.
तालुका कृषी विभाग गुहागर यांच्यामार्फत भाजावळ न करता प्लास्टिक ट्रेमध्ये भात रोपवाटिका तयार करून यंत्राद्वारे लागवड करण्याचे प्रात्यक्षिक यावेळी शेतकरी वर्गाला दाखवण्यात आले. यामध्ये प्लास्टिक ट्रेमध्ये भात रोपवाटिका तयार केल्यामुळे उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होऊन भात शेती फायदेशीर कश्या प्रकारे ठरू शकते याचे प्रात्यक्षिकासह महत्त्व सांगण्यात आले. ट्रेमध्ये भात रोपवाटिका तयार करणे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आहे, असेही कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
यावेळी या प्रत्यक्षिकासाठी उपस्थित शेतकरी वर्गाला तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.



