कुसुमताई पतसंस्थेने जाहीर केला १५ टक्के लाभांश

रत्नागिरी : येथील कुसुमताई सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. पतसंस्थेला यंदा ७२ लाख २३ हजारांचा नफा झाला असून सभासदांना १५ टक्के घसघशीत लाभांश जाहीर केला असून संस्थेच्या ठेवी १०० कोटी करण्याकरिता लवकरच उद्दिष्टपूर्तीचे नियोजन करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. नाना शिंदे होते. तसेच उपाध्यक्ष सतीश शेवडे, संचालक प्रमोद रेडीज, विजय बेहरे, तेजा मुळ्ये, अविनाश जोशी, प्रसन्न दामले, लीना घाडीगावकर, महेश सनगरे आदी प्रमुख आणि बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
या वेळी प्रमोद रेडीज यांनी संस्थेच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करताना रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत १०० कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे सभासदांना आवाहन केले. अध्यक्ष प्रा. नाना शिंदे यांनी माजी आमदार स्व. कुसुमताई अभ्यंकर यांच्या नावाला अभिप्रेत असलेली पतसंस्था उभी करण्यात कर्मचारी आणि सभासद यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.
तेजा मुळ्ये यांनी पतसंस्था आणखी विस्तारण्यासाठी शाखा सुरू करावी, असे सांगितले. अहवाल वाचन उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले. पतसंस्था सामाजिक काम करत असून शैक्षणिक मदत, आजारी पडलेल्या व्यक्तींना मदत करते. संस्थेच्या ठेवी ५२ कोटी २३ लाख, कर्जे ४५ कोटी ९७ लाख रुपये, संस्थेचे भागभांडवल ७७ लाख रू. आहे आणि नफा ७२ लाख २३ हजार रुपये झाला आहे. नुकत्याच झालेल्या ठेववृद्धी मासात ६ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, अशी माहिती शेवडे यांनी दिली. विजय बेहरे यांनी आभार व्यक्त केले.


