आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’द्वारे खरीप पीक नोंदणी मोहीम सुरू

१० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के नोंदणीचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२६-२०२७ साठी केंद्र शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ (DCS MH) मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीची मोहीम सुरू झाली असून, १० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के पीक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व शेतकरी खातेदारांना केले आहे. ही कार्यवाही ११ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गट क्रमांक व सर्व्हे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष शेतातील पिकांची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. यासाठी गावनिहाय सहायकांची नेमणूक करण्यात आली असून, नोंदणीकृत सहायकांमार्फत ही सर्व नोंदणी विनामूल्य (कोणतेही शुल्क न घेता) केली जात आहे.

डिजिटल पीक नोंदणीद्वारे अद्ययावत होणाऱ्या या माहितीचा थेट फायदा शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजनांचा थेट लाभ मिळवण्यासाठी, पीकविमा भरपाई व आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नुकसान भरपाईसाठी, कृषी सांख्यिकी आणि केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पासाठी अशा विविध शासकीय कामांसाठी होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही मोहीम वेळेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व तहसीलदार, कृषी विभाग तसेच क्षेत्रीय यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी खातेदारांनी आपल्या शेतजमिनीतील क्षेत्राची १०० टक्के पीक नोंदणी पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित सहायकांकडून करून घ्यावी. नोंदणी प्रक्रियेत काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी गावाचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा कृषी सहायकांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!