आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले

रत्नागिरी : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी समृद्धी योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी योजनेतील विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

सुक्ष्म सिंचन सुविधा या बाबीमधून इलेक्ट्रिक मोटर पंप, डिझेल/पेट्रोल इंजिन, शेततळे, पाईप संच पुरवठा, ठिबक सिंचन व तुषार सिंचन यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण – या बाबीमधून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप, भात कापणी यंत्र, कडबा कुट्टी, श्रेडर, वड चीपर, सपारी काढणी यंत्र आदी यंत्र अवजारांना अनुदान मिळणार आहेत.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या बाबीमधून उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटीका, क्षेत्रविस्तार घटकांतर्गत ड्रॅगन फ्रुट (Exotic Fruit Crop), पुष्पोत्पादन, फळपिके, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, काढणीत्तोर व्यवस्थापन-फॉर्म गेट पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र-काजू, आंबा आणि पणन सुविधा बाबींसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या बाबीमधून कमीत कमी १० गुंठे तर जास्तीत जास्त जास १० हेक्टरपर्यंत काजू, आंबा, नारळ, कोकम, फणस इ. फळपिकांना अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया या बाबींमधून कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना ३० टक्के किंवा ५० लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींच्या खरेदीसाठी शेतावर विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते.  या योजनांचा लाभ घेण्याकरीता आपला ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. अग्रीस्टॅक फार्मर आयडी नसल्यास आपल्या नजिकच्या सोएससी सेंटर, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधून अग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावा.  सद्यःस्थितीमध्ये सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यामध्ये महाडीबीटी प्रणालीवर एकूण ५ हजार १७ शेतकऱ्यांची वेगवेगळ्या बाबीसाठी निवड झालेली आहे. त्याकरीता १८.५७ रूपये कोटी इतका निधी खर्च होणार आहे या व्यतिरीक्त वरील योजनांसाठी रक्कम ७४ कोटी रुपये कृषी समृद्धी योजनेमधुन निधी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राप्त होणार आहे.

संबंधितांनी काही शंका/अडचणी असल्यास ०२२-६१३१६४२९ या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वा. (सोमवार ते शुक्रवार) दरम्यान संपर्क करू शकता.  योजनेबाबत अधिक माहितीसाठी  आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा.

कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलप्रणाली विकसित केले आहे. ‘प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य’ या पध्दतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. आपण अर्ज केलेल्या यंत्र/अवजाराची आवश्यक कागदपत्र (उदा. दरपत्रक, टेस्ट रिपोर्ट, जात प्रमाणपत्र इ.) महाडीबीटी पोर्टलवर अग्रीस्टॅक फार्मर आयडीने लॉगीन करुन आपली निवड झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अपलोड करावेत. अन्यथा महाडिबीटी पोर्टलव्दारे आपला अर्ज रद्द करण्यात येवून आपण लाभापासून वंचित राहू शकता. शेतकऱ्यांनी विलंब न करता अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजिकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा https://mahadbtmahait.gov.in या आज्ञावलीवर देखील अर्ज करता येऊ शकेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!