रत्नागिरी नगरपालिकेत शिवसेनेचा निर्भीड विरोधी आवाज
माजी खासदारांकडून ठाकरे सेनेच्या तीनही नगरसेवकांचे अभिनंदन

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव व रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी नगरपालिकेत निवडणुकीत ठाकरे सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक अमित विलणकर, केतन उमेश शेट्ये आणि फौजिया तनवीर मुजावर यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना माजी खासदार राऊत यांनी हे तिन्ही नगरसेवक सत्तेचा भाग नसून रत्नागिरी नगरपालिकेत विरोधी बाकावर बसून शिवसेनेची ठाम, निर्भीड व जनहिताची भूमिका मांडणार आहेत. सत्तेसमोर झुकणारे नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे, अन्यायाविरोधात लढणारे आणि रत्नागिरीकरांच्या न्याय-हक्कासाठी संघर्ष करणारे निर्भीड शिवसैनिक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सत्ता, पद आणि सोयीपेक्षा सत्य, संघर्ष आणि स्वाभिमानाला प्राधान्य देणे हीच खरी जनहितवादी भूमिका असून, रत्नागिरी नगरपालिकेत हा विरोधी आवाज अधिक बुलंद राहील, असेही राऊत म्हणाले.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देत, विरोधी बाकावरूनही रत्नागिरीकरांचा स्वाभिमानी, लढवय्या बाणा जपण्याचे आवाहन केले.



