गुहागर किनाऱ्यावर वाढता कचरा
पर्यटकांच्या निष्काळजीपणावर स्थानिकांची तीव्र नाराजी

गुहागर : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात होताच येथील किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र या वाढत्या पर्यटनासोबतच किनाऱ्यावरील कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या, अन्नाने भरलेले डबे, चिप्सचे रॅपर्स आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यावर टाकून दिला जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही समस्या केवळ गुहागरपुरती मर्यादित नसून देशातील अनेक पर्यटन स्थळांवर अशीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी जबाबदारीने वागून स्वच्छता राखावी, तसेच प्रशासन आणि स्थानिकांनी मिळून कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
“आमचं गुहागर, आपलं गुहागर असं म्हणणारे लोक हा कचरा पाहून कसे निघून जातात? निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक त्याच निसर्गाचा अनादर करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सुट्टीचे दिवस किंवा शनिवार-रविवार आला की मन अस्वस्थ होतं. पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि त्यांच्या मागे कचऱ्याचा ढीग ठेवून जातात. त्यामुळे या सुंदर किनाऱ्याचं सौंदर्य वारंवार उद्ध्वस्त होत आहे,” अशा शब्दांत स्थानिक नागरिक डॉ. स्वाती गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.



