क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

डेरवणमध्ये १२वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात

प्रन्मय शेंबेकर, ईश्वरी मुळे, श्रावण साळुंखे, अबोली वास्के, वैभव गाडे, स्वरा उपशेटे, अथर्व ताटे व रिया गोंडाळ विजेते

डेरवण (चिपळूण) : एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमी, डेरवण यांच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित १२वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यातील विविध भागांतून आलेल्या ७०० पेक्षा अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत मैदानावर आपल्या धावण्याच्या क्षमतेचे दर्शन घडविले. स्पर्धेतील विविध वयोगटांमध्ये प्रन्मय शेंबेकर, ईश्वरी मुळे, श्रावण साळुंखे, अबोली वास्के, वैभव गाडे, स्वरा उपशेटे, अथर्व ताटे आणि रिया गोंडाळ यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे उद्घाटन फिटनेस व स्ट्रेंग्थ तज्ज्ञ तपन वैद्य, श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीपाद बाणवली, मुख्याध्यापिका शरयू यशवंतराव, माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू अजित गालवणकर, रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शालेय क्रीडा स्पर्धांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना आपल्या तयारीची प्रत्यक्ष स्पर्धेच्या माध्यमातून चाचणी घेता यावी, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे दरवर्षी या स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळतो. क्रॉस कंट्री स्पर्धेमुळे खेळाडूंच्या सहनशक्ती, वेग, स्टॅमिना आणि मानसिक ताकदीची कसोटी लागते. आगामी शालेय, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना या स्पर्धेतील कामगिरी आपल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरते.

विजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये नव्या आत्मविश्वासाचा आणि उत्साहाचा संचार झाला, तर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला स्वतःची कामगिरी आणखी उंचावण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यामुळे ही स्पर्धा केवळ विजयासाठीची स्पर्धा न ठरता खेळाडूंच्या भविष्यातील कामगिरीसाठी मार्गदर्शक ठरली.

या स्पर्धेत विविध वयोगटांतील ७०० पेक्षा अधिक मुला-मुलींनी सहभाग घेतला. डेरवण परिसरात सकाळपासूनच धावपटू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यामुळे स्पर्धेसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आणि धावपटूंमध्येही कमालीचा उत्साह दिसून आला.

लहान वयातील स्पर्धकांनीही मोठ्या आत्मविश्वासाने धाव घेत आपली जिद्द आणि चिकाटी दाखवून दिली. मार्गावर उपस्थित असलेल्या पालक व प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत छोट्या धावपटूंना प्रोत्साहन दिले. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला आयोजकांच्यावतीने टी-शर्ट आणि अल्पोपहार देण्यात आला. तसेच आठही गटांतील प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालक, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळाडूंनीही मिळालेल्या प्रोत्साहनाला प्रतिसाद देत शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा पूर्ण केली.

एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नवोदित धावपटूंना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेतून भविष्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कमलाकरपंत वालावलकर यांच्या स्मृती जपत क्रीडा क्षेत्रातील नव्या पिढीला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा डेरवणच्या क्रीडा संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरली.

स्पर्धेचा निकाल (अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक) – १२ वर्षाखालील मुले व मुली- प्रन्मय शेंबेकर- चिपळूण, कैवल्य भोवारे- चिपळूण, हर्शल गंबरे- चिपळूण, सार्थक कशेद- सातारा, साहिल चव्हाण- लांजा. ईश्वरी मुळे- कराड, प्रांजळ घुमे- संगमेश्वर, श्रावणी मोरे- लांजा, ऋतुजा पानगले- चिपळूण, आरोही शीतप- गुहागर. १४ वर्षाखालील मुले व मुली- श्रावण साळुंखे- कराड, समर्थ सुर्वे- कराड, राज यादव- कराड, आयुष जाधव- चिपळूण, जय भुवड- चिपळूण. अबोली वास्के- कराड, आराध्या वास्के- कराड, ईश्वरी गरुड- कराड, चीन्मई शिगवण- गुहागर, इच्छा राजभर- चिपळूण.

१६ वर्षांखालील मुले व मुली- वैभव गाडे- सांगली, कृष्णा वाडकर- कराड, हिमांशू सालोदे- सांगली, गणराज धोत्रे- सातारा, रोहन राठोड- चिपळूण. स्वरा उपशेटे- लांजा, रिद्धी भालेकर- चिपळूण, सान्वी सुर्वे- रत्नागिरी, अक्षया कोळंबेकर- रत्नागिरी, वैदही जंगम- चिपळूण. १८ वर्षाखालील मुले व मुली- अथर्व ताटे- सातारा, सागर शर्मा- सांगली, आयुष बर्जे- दापोली, प्रज्वल येडगे, मयूर सोयान. रिया गोंडाळ- कराड, राणी गावडे- कराड, आर्या डोर्लेकर- रत्नागिरी. रिद्धी चव्हाण- रत्नागिरी, सिमरन पवार- संगमेश्वर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!