आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांकडून भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगरपरिषद, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स, एम.एम.बी. माध्यमातून १९ सप्टेंबर रोजी भाट्ये समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेऊन, प्लास्टिक प्रदूषण संपवून पर्यावरणाला हातभार लावा, असे, आवाहन निवास उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
भाट्ये येथील समुद्र किनारा आज स्वच्छ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, पंचायत समिती सदस्य अर्चना साळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी उमेश गावखडकर, उपमुख्याधिकारी मयूर बेहरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी म्हणाले, समुद्र, नदी, जलस्त्रोत या ठिकाणी आज विशेषत: प्लास्टिक प्रदूषण होत आहे. त्याची स्वच्छता करणे, हे प्रदूषण रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता स्वत:पासून, आपल्या घरापासून करावी.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून ‘एकल प्लॉस्टिक वापरु नका, एकच ध्यास ठेवू या प्लॉस्टिक पिशवी हटवू, समृध्द पर्यावरणाचे रक्षण करू या. वापर टाळू या प्लॉस्टिकचा जागर करू या’ पर्यावरणाचा असा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचे प्रकाशन आणि वितरण यावेळी करण्यात आले.
यावेळी स्वच्छतेची शपथ सर्वांनी घेतली. यावेळी स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


