सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल : आमदार शेखर निकम यांचा विश्वास

आबलोली (संदेश कदम) : कोकण हा पहाडांचा प्रदेश आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रेरित करणे व त्यांची लागवड कायम ठेवणे ही प्राथमिक गरज लक्षात घेऊन या ठिकाणी माती परीक्षण प्रयोगशाळा शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आली असून मृदा संवर्धन, गरजेनुसार खतांचा वापर या तत्त्वावर ही प्रयोगशाळा कार्यरत असणार आहे. त्यामुळे सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे.
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते – दहिवली (ता. चिपळूण) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम व पुणे घरडा केमिकलचे उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी आमदार शेखर निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार निकम यांनी प्रयोग शाळेचा पुरेपूर वापर करत आपल्या शेतातील मातीचे आरोग्य सुधारणे तसेच उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करून शेतकऱ्यांना सहकार्य कायम राहील असा शब्द दिला आहे.

यानंतर घरडा केमिकलचे उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी यांनी सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळेच्या उपक्रमास शुभेच्छा देऊन घराला केमिकल्स आपल्या सदैव पाठीशी राहून सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी या प्रयोगशाळेचा कार्य अहवाल सादर केला. या प्रयोगशाळेतून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १३ हजार मातीचे नमुने यशस्वीरित्या तपासून संबंधित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहेत. या प्रकल्पासोबतच महाविद्यालयातील बेकरी युनिट, अत्याधुनिक संगणक कक्ष व डिजिटल रूमचे देखील उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. सुनित कुमार पाटील यांनी जाहीर केले.
या संपूर्ण कार्यक्रमाला सह्याद्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत निकम, डॉ. ईशाक खतीब, ज्येष्ठ संचालक मारुतीराव घाग, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


