पटवर्धन हायस्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी : येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक कल्पना शिरोळकर व अमर लवंदे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावी ‘फ’ मधील विद्यार्थिनी सांची प्रशांत हरचकर हिने प्रभावीपणे केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्य, स्वराज्याची संकल्पना, राष्ट्रप्रेम आणि समाजजागृती यांवर मनोगते व्यक्त केली. भूमिका काळू, प्रतीक्षा गोसावी, काव्या पाटील, गौरी कांबळे, रुद्र लिंगायत, आदेश मांयंगडे व तनिष्का धनावडे या विद्यार्थ्यांनी प्रभावी विचार मांडून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी २२ जुलै रोजी आयोजित केलेल्या घोषवाक्य व निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेचा निकाल दहावी ड वर्गातील काव्या पाटील हिने जाहीर केला. श्री. मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी ड वर्गाने लोकमान्य टिळक जयंती निमित्त निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांनी लोकमान्य टिळकांचे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षक श्री. गोरे यांनी आभार मानले.



