जिल्हा परिषदेत माहिती अधिकार अर्ज ई- टपाल नाकारले जात असल्याचा प्रकार

रत्नागिरी : जिल्हा परिषद कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या ई-टपाल कक्षात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
नागरिकांकडून वारंवार माहिती अधिकाराचे अर्ज देण्यासाठी प्रयत्न केले जात असताना, “आमच्याकडे माहितीच्या अधिकाराचे अर्ज स्वीकारले जात नाहीत, तुम्ही तो थेट संबंधित विभागात जाऊन द्या आणि पोच घ्या,” असा निर्वाळा संबंधित कर्मचाऱ्यांनी दिला आहे. विशेष बाब म्हणजे, कर्मचाऱ्यांकडून असेही सांगण्यात आले की, “आम्हाला सूचना आहेत की माहितीच्या अधिकाराचे तसेच कुठल्याही मिटिंगचे अर्ज स्वीकारू नयेत.”
यासंदर्भात कोणत्या अधिकाऱ्यांकडून हे आदेश मिळाले आहेत, याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार नीलेश रहाटे यांनी ई-टपाल कक्षमध्ये विचारणा केल्यावर याचे उत्तर देण्याचे टाळण्यात आले.



