नमन ही हिंदू संस्कृती जपणारी, समाजाला एकत्र आणणारी परंपरा”
तरुणांनी मूळ संस्कृतीशी जोडून राहण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

रत्नागिरी : “नमन ही केवळ एक मनोरंजनाची लोककला नसून, ती हिंदू संस्कृती जपणारी आणि समाजाला एकत्र आणणारी एक महान परंपरा आहे. ती आपल्या इतिहासाची मूळ आहे. त्यामुळे तरुणांनी आधुनिक जगात प्रगती करत असताना कोकणच्या तरुणांनी ‘नमन’ लोककला आणि हिंदू संस्कृतीचा समृद्ध वारसा विसरू नये, तर तो जपण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले.
हातखंबा (रत्नागिरी) येथे नमन लोककला रत्नागिरी जिल्हा, मातृसंस्था आयोजित “नमन – कोकणची समृद्ध लोक संस्कृती” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी बोलताना त्यांनी कोकणच्या लोकसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. नमन लोकसंस्कृती ही केवळ परंपरा नाही, तर ती आपल्या इतिहासाची आणि ओळखीची मूळ आहे. “आपल्या पूर्वजांनी रामायण-महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथांमधून प्रेरणा घेऊन ही कला टिकवली आहे. ही कला केवळ टिकवणे नव्हे, तर पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आता आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सामंत यांनी आवाहन केले.
नमन कोकणाची समृद्ध लोकसंस्कृती या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात व्यासपीठावरून बोलताना पालकमंत्री उदय सामंत, सोबत अध्यक्ष पी. टी. कांबळे, युयुत्सु आर्ते.यावेळी त्यांनी तरुण पिढीला अत्यंत मोलाचा संदेश दिला. “आजच्या तरुण पिढीने शिक्षणात उत्कृष्ट प्रगती करावी, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या मूळाशी (संस्कृतीशी) जोडून राहणे अत्यंत गरजेचे आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना कोकणची संस्कृती, परंपरा आणि लोककला यांचा अमूल्य ठेवा या पुस्तकात जपला गेला आहे. “या समृद्ध वारशाचे दस्तऐवजीकरण करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य संतोष गोनबरे यांनी केले असल्याचे त्यांनी म्हटले.
या लोककलेचे संवर्धन व्हावे यासाठी त्यांनी सर्व नमन मंडळांना नोंदणी करून शासनाच्या योजना आणि लाभांचा फायदा घेण्याचे आवाहन केले. ही कला आणि परंपरा टिकवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे. आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत,” असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.

“नमन – कोकणची समृद्ध लोक संस्कृती” या पुस्तकाच्य प्रकाशन सोहळ्याला उदय सामंत, समवेत प्रमुख उपस्थिती मध्ये अरुण इंगवले (भाषा अभ्यासक आणि साहित्यक), डॉ. निधी पटवर्धन (लोककला अभ्यासक आणि लेखिका), सुनील बेंडखळे (लोककलाकार), सचिन काळे (‘चला हवा येऊ द्या’ फेम महाराष्ट्राचा सुपरस्टार), शिवसेना पदाधिकारी महेश उर्फ बाबू म्हाप, बंड्या साळवी, सौ. साक्षी रावणांग, संतोष कुले (संस्थापक-अध्यक्ष), परशुराम मासये (सचिव), युयुत्सु आरते (उपाध्यक्ष), पी. टी. कांबळे (अध्यक्ष), प्रा. सचिन गोणबरे, पत्रकार अमोल पालये तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्य, नमन लोककला रत्नागिरी जिल्हा, मातृ संस्था यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक, पर्यावरण, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले.
मृदुंगाचा बाज नाहीसा होतोय : सचिन काळे
आज नमन या लोककलेचे सादरीकरण होत असताना त्यातील महत्त्वाचे वाद्य म्हणजे मृदुंग वादन. पण या नमन कलेतील नवनवीन इतर वाद्यांच्या तालात मृदुंगाचा बाज नाहीसा होत असल्याची खंत अभिनेते सचिन काळे यांनी व्यक्त केली. मृदुंग ही वादन कला नमनाच्या माध्यमातून टिकून राहावी. ती सर्व दूर रसिकजणांच्या मनावर रुळली पाहिजे. त्यासाठी मृदुंग वादनाचा बाज कायम टिकून राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लवकरच रत्नागिरीमध्ये मृदुंग वादन स्पर्धा घेण्याचा मानस सचिन काळे यांनी यावेळी व्यक्त केला.


