अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, रत्नागिरी-१ अंतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.
अंगणवाडी सेविका (रिक्त पदे असलेली ठिकाणे) – दाभिळ आंबेरे (ग्रामपंचायत डोर्ले), गावखडी कुंभारवाडी (ग्रामपंचायत गावखडी), गोळप धोपटवाडी (ग्रामपंचायत गोळप), हातखंबा डांगेवाडी (ग्रामपंचायत हातखंबा). अंगणवाडी मदतनीस (रिक्त पदे असलेली ठिकाणे) – पानवल घवाळीवाडी (ग्रामपंचायत पानवल), तोणदे बौध्दवाडी (ग्रामपंचायत तोणदे), गोळप वायंगणी (ग्रामपंचायत गोळप), डोर्ले अंगणवाडी (ग्रामपंचायत डोर्ले).
शैक्षणिक पात्रता आणि नियम : उमेदवाराने किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (राज्य शिक्षण मंडळ अथवा समकक्ष). पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड, बी.एड असल्यास त्यांचे गुणपत्रक जोडावे. ग्रामीण प्रकल्पातील या पदांवर काम करण्यासाठी उमेदवार केवळ त्या ग्रामपंचायतीचा नाही, तर प्रत्यक्ष त्या महसुली गाव/वाडी/वस्ती किंवा पाड्यातील स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे. सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ३५ वर्षे राहील. विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असेल.
शासनाच्या ३० जानेवारी २०२५ च्या निर्णयानुसार गुणांकन केले जाईल. अतिरिक्त गुणांसाठी खालील प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे- जातीचा दाखला (SC/ST/OBC/VJNT/EWS/SBC/SEBC प्रवर्गासाठी) विधवा किंवा अनाथ असल्याबाबतचा दाखला, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये), अंगणवाडी सेविका/मदतनीस म्हणून किमान २ वर्षांचा अनुभव असल्यास त्याचा दाखला, MS-CIT किंवा शासनाने समकक्ष ठरविलेला संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
अर्ज करण्याची अंतिम मुदत- १० ऑगस्ट २०२६, सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
पत्ता- बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी १, साईप्रसाद हाऊस, एकता मार्ग, नाना नानी पार्क शेजारी, मारुती मंदिर, रत्नागिरी.
सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९. ४५ ते सायंकाळी ६. १५ या वेळेत संपर्क साधावा. विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्जच स्वीकारले जातील. खाडाखोड असलेले किंवा अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज बाद ठरवले जातील. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही आणि अपूर्ण अर्जांबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.



