नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत “माय भारत” उपक्रम; ३१ जुलै रोजी विविध सांस्कृतिक स्पर्धा

रत्नागिरी : भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत रत्नागिरीच्या वतीने जिल्ह्यातील तरुणांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व त्यांना राष्ट्रनिर्माणाशी जोडण्यासाठी ३१ जुलै रोजी एका विशेष जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या महोत्सवात सहभागी होऊन या देशव्यापी मोहिमेचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम व्यसनमुक्त आणि प्रगत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची ऊर्जा आणि सर्जनशीलता एकत्र आणण्यावर भर देतो. जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील सर्व तरुण-तरुणींसाठी हा कार्यक्रम खुला आहे.
युवकांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमात ८ वेगवेगळ्या सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.
संगीत (लोकगीते) – लोकसंस्कृती व परंपरेचा जागर. सांस्कृतिक नृत्य – नृत्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश. पथनाट्य / मूक अभिनय– व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांवर प्रभावी प्रकाशझोत. चित्रकला स्पर्धा – तंदुरुस्त आणि व्यसनमुक्त समाजाचे कॅनव्हासवरील चित्रण. वादविवाद स्पर्धा – युवा आरोग्य आणि राष्ट्रीय विकास यावर बौद्धिक मंथन. शॉर्ट फिल्म/ रील मेकिंग – डिजिटल माध्यमातून जनजागृती. घोषवाक्य लेखन – प्रभावी शब्दांतून सकारात्मक संदेश. स्लॅम पोएट्री – प्रभावी काव्यवाचन या विषयांचा समोवश करण्यात आला आहे.
याविषयीची सविस्तर माहिती आणि नोंदणीसाठी इच्छुकांनी mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘Nasha Mukt Bharat’ या इव्हेंट्स सेक्शन अंतर्गत माहिती मिळवावी, असे कळविण्यात आले आहे.


