मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास मंदावला

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास मंदावला असून आगमन रखडले आहे. नैऋत्य मोसमी पाऊस हर्णै-दापोली (जि. रत्नागिरी) परिसरापर्यंत पोहोचून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे त्याची प्रगती थांबली आहे. मुंबईत तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास असून नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत. आता पुढील आठवड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मान्सून हा देशाच्या अर्थचक्राचा प्राणवायू मानला जातो. अशावेळी एल निनोची वाढती ताकद चिंतेचे कारण ठरत आहे. पावसाच्या वाटेत एल निनोचं नवं संकट आल्याचं दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, काही भागांत पाऊस लांबणीवर पडू शकतो. काही भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी अल्पावधीत मुसळधार पावसाचे तडाखे बसू शकतात. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि असह्य उष्णतेने त्रस्त झालेल्या परभणीकरांना गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला.
शहरासह परिसरात विजांचा प्रचंड कडकडाट,वादळी वारे आणि पावसाने जोरदार हजेरी लावली.अचानक बदललेल्या वातावरणामुळे काही काळ शहरात धुळीचे लोट पसरले.त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, वादळी वाऱ्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून शहरातील जवळपास अर्ध्या भागात काही काळ वीज गुल झाली.पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही घडल्या.मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असला, तरी नियमित आणि समाधानकारक पावसाची अपेक्षा अद्याप कायम आहे.



